Saturday, July 7, 2018

शेततळे

शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन परिस्थितीत पिकास उपलब्ध होण्यासाठी किंवा जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी खोदलेले तळे म्हणजेच शेततळे. जमिनीतील पाण्याची पातळी वाढविण्यासाठी, मत्स्य उत्पादनासाठी, पिण्यासाठी, घरगुती उपयोगासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो.
शेततळे कसे बनवाल ?
  • शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे.
  • या खड्ड्याच्या आतील बाजूने प्लास्टिक पेपर अंथरावा. (याला लायनिंग असे म्हणतात).
  • हा प्लास्टिक पेपर साधारण १०० मायक्रोन आणि ४०० ते १००० गेज चा असावा.
  • शेत तळ्याच्या बाजूच्या भिंतींचा कोन साधारण ४५ अंश च्या जवळ असणे महत्वाचे असते.

शेततळे बांधताना घ्यावयाची काळजी :

  • शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी.
  • शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
  • चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चिेत करावी.
  • शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र मोजावे.
  • शेतातील पाण्याचा प्रवाह निश्चित करावा.
  • शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी.
  • शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्राकरिता 20 X 20 X 3 मी. (1200 घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
  • शेततळे बांधताना माती शेततळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी.
  • ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा.
महाराष्ट्र शासनाने मागेल त्याला शेततळे या योजनेअंतर्गत शेततळे बांधण्यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. या योजनेसाठी शेतकरी बांधव अर्ज भरू शकतात.

लाभार्थी पात्रता :

  • शेतकऱ्याकडे त्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असावी. यात कमाल जमीन धारणेची मर्यादा नाही.
  • लाभार्थी शेतकऱ्याची जमीन तांत्रिक दृष्ट्या पात्र असणे आवश्यक राहील. जेणेकरून पावसाचे पाणी शेततळ्यामध्ये भरणे किंवा पुनर्भरण करणे शक्य होईल.
  • अर्जदाराने यापूर्वी शेततळे, सामुदायिक शेततळे किंवा भातखाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नसावा.
अर्जदाराला खालील कागदपत्रे सदर करणे आवश्यक आहे.
  • जातीचा दाखला
  • ७/१२ चा उतारा
  • ८ -अ नमुना (संबंधित शेतक-याचे ८ अ प्रमाणे एकूण क्षेत्र)
  • आत्महत्याग्रस्त्त कुटुंबाच्या वारसाचा दाखला. (तलाठी)
  • दारिद्र्य रेषेबाबतचा दाखला (ग्राम सेवक)
  • स्वतःच्या स्वाक्षरीसह भरलेला अर्ज
  • आधार कार्ड (उपलब्ध असल्यास)

0 comments:

Post a Comment